Friday, February 22, 2019

Monday, August 08, 2016

रसाळगड

रसाळगड

सह्यमेळाव्याचा निमित्ताने रसाळगड ला भेट देण्याचा योग आला. आगदी ठरल्या वेळेप्रमाणे गाडी ठिकाणावार आली आणि एकेकाला घेत चांदणी चौक ओलांडुन पुढे आलो. सकाळपासुन फारसा पाउस झाला नव्हताच आजुनही तसेच वातावरण होते नुसते ढगाळलेले. थोडे अंतर पुढे गेल्यावर आप्पा ने गाडीत डिझेल भरावे लागेल असे सांगितले, पंपाच्या शोधात आम्ही पार हिंजेवाडी मधे जाऊन पोहोचलो. नेहमी प्रमाणे पुण्याची गाडी पोहोचायला उशीर होणारच आता. 

पौड सोडल्यावर वातावरण एकदम बदलले एकदम कोंदट झाले होते आणी एकाएकी पाउस कोसळू लागला एकदम धुव्वाधार. घाटमार्गाला लागलो तसा पावसाचा जोर खुप वाडला होता, आगदी १०-१२ फुट पुढचे काहीच दिसत नव्हते. तरीही आप्पा गाडी चालवता चालवता आम्हाला रस्त्याच्या कडेने त्याला दिसलेले साप दाखवत होता. हा आप्पा एक पक्का ट्रेक ड्रायव्हर आहे. 

गाडीमधे, ओंकार त्याचे रेस्क्यु मधे आलेले अनुभव, आशु त्याचा जम्मु-पुणे सायकल मधल्या काही घटना, मायबोली, इत्यादी गप्पा चालुच होत्या. माण ला पोहोचलो तेव्हा एका टपरीवर एक म्हातारे आजोबा चहा विकत बसले होते तिथे चहा प्यायला थांंबलो. पाउस चालुच होता संततधार. आजुन २-३ तास प्रवास होता. 


खेड ला पोहोचे पर्यंत पुर्ण उजाडले होते. पाउस चालुच होता, चहा पिण्यासाठी परत उतरलो. इथे चहाबरोबर भजी, वडे, पॅटीस, मंचुरीयन भजी इत्यादी गरम गरम तयार होते ते ही सकाळी ६.३० वाजता. चहा पिताना एकाने विचारले पॅटीस गरम आहे का ?? तर त्या टपरीवाल्याने ते पॅटीस परत कढईत टाकुन तळले म्हणाला ग्या साहेब गरम पॅटीस. टपरी वाल्याने सांगितल्या नुसार, इथे या भागामधे २ दिवसांपासुन पाउस लागुन राहिला होता आजुन २ दिवस राहीला तर जगबुडी नदीला पुर येउन आमचा परतीचा रस्ता बंद होणार होता. थोडे पुढे गेल्यावर जगबुडी नदीवरील पुलाच्या वर पाणी येण्यासाठी फक्त २ फुट अंतर बाकी होते.


अर्ध्या पाउण तासात रसाळगडाची वाट गाडी चढू लागली, इथे अर्ध्यापर्यंत चांगला गाडी रस्ता झाला आहे. अर्ध्या तासाची पावसाची उघडीप मिळाली होती. पण जसं गाडीतुन उतरलो तसे पुन्हा पाउस सुरु झाला.   तिथुन १५-२० मिनीटात रसाळागड वाडीच्या खिंडीत पोहोचलो. इथुन ट्रेक ला सुरुवात झाली.

किल्ला चढायला सुरुवात केली, पाय-यांची वाट आहे, थोडे वर गेलो आणी पहीला दरवाज्यापाशी पोहोचलो पण. बाजुलाच तटावर मारुतीराय विराजमान झालेले आहेत. पुढे पाय-या ने वर जात दुसरा दरवाजा ओलांडुन पुढे गेलो धुक्यामुळे फार पुढचे काही दिसत नव्हते त्यात भणाणता वारा आणी धो-धो पाऊस. २०-२५ मिनिटांच्या चढाईत झोलाई देवीच्या मंदिरा पाशी येउन पोहोचलो. मुंबई वरून आलेली मित्र मंडळी आमची वाटच पहात थांबले होते. पोहोचल्यावर गळाभेटी झाल्या.







झोलाईचे मंदीर हे गडावरचे मुख्य दैवत, मंदीर एकदम प्रशस्त आहे ३०-३५ लोक आरामात मुक्काम करू शकतात. मंदिरात पोहोचल्यावर एक कोपरा पकडला कोरडे कपडे घातले तो पर्यंत गावातून पोहे आणी गरम चहा हाजीर. सकाळचे १० वाजले असतील. सुरवातीच्या सत्रात सर्वांनी आपापली ओळख करुन दिले. सुनटुन्या, हेम, मध्यलोक, आशुचॅम्प, पवन, ओंकार ओक, यो रॉक्स, सिद, विनय भिडे, घारूआण्णा, गिरीविहार, इंद्रधनुष्य, हिम्सकुल, मल्ली, आका, मनोज यांच्या उपस्थितीत सह्यमेळाव्याच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. थोड्या गप्पा होइस्तोवर जेवण आले. जेवल्यावर सगळेच पेंगुळले. मी वाट बघत होतो ती पाऊस थांबायची. गडाचा फेरफटका मारायची इच्छा मनात चुळबुळत होती.  थोडसं पडलो ते एकदम झोपच लागली. 

तासाभराने जाग आली, बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता. एकटाच बाहेर पडलो. मंदीरा समोर सुरेख दिपमाळ आहे. बाजुला बांधीव टाके आहे, त्यातले पाणी पिण्यासाठी वापरले जाते तर त्या समोरच आजुन एक टाके आहे. पावसाने दोन्ही टाकी पुर्ण भरली होती.  त्यापुढे तटबंदी, बुरुज असलेली गडाची मुख्य इमारत आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच चुनखडी मळण्याचा घाणा दिसतो. त्यापुढे राजवाड्याचे जोते आता शिल्लक आहे. थोडे तिथेच इकडे तिकडे फिरलो तर तितर त्याच्या पिल्लांसहीत एका झुडुपात शिरताना दिसले त्याच्या मागे गेलो तो पर्यंत ते गायब झाले. पाऊसाला परत सुरुवात झाली म्हणुन परतलो तर सगळे जण हातात दो-या घेऊन गाठी मारत होते. विरग ने माझ्या हातात दोर दिला. सुनटुण्या दोराच्या सहाय्याने पर्वतारोहण करताना उपयोगी पडणा-या सोप्या गाठी कश्या माराव्यात याचे मार्गदर्शन करत होता. कोणत्या वेळेस कोणत्या पद्धतीने दोर बांधावा, योग्य प्रकारे गाठी मारुन जास्तीजास्त सुरक्षीत पणे कशी चढाई करता येते हे त्याने प्रात्यक्षिकांसह दाखवले आणी वेगवेगळ्या साहित्याची ओळख करून दिली.  त्यातल्या काही गाठी विराग ने माझ्या कडुन करून घेतल्या. विराग ने ट्रेकिंग च्या पाऊच मधे काय काय असले पाहिजे आणि त्याचा काय उपयोग होऊ शकतो हे त्याच्या जवळील पाऊच मधुन एकेक वस्तु काढुन दाखवले. 

मी मल्लीनाथ आणि त्याचा मुलगा परत किल्ला पहायला बाहेर पडलो, राजवाड्याच्या तटबंदीतुन मागच्या बाजुला उतरलो पाउस पुर्ण थांबला होता. तरीपण ढगांचे अच्छादन कमी झाले नव्हते, भयाण वारा सुटला होता ढग पुढे सरकत होते तितकेच परत मागुन येत होते. स्वर्ग म्हणतात तो हाच असावा. पाउलवाटेने गडाच्या कोपर्‍यापर्यंत पोहोचलो आणि सिनेमा चालू होताना पडदा उघडावा तसे ढग बाजुला झाले. निव्वळ अप्रतीम नजारा याच साठी मी इथे आलो होतो. आजुबाजूला हिरवेगार डोंगर त्यावरून कोसळार्‍या शुभ्र धारा, दरी मधे नागमोडी वळाणे घेत धावणारी जगबुडी नदी. डोळे एका जागी स्थिर रहात नव्हते. सारा आसमंत डोळ्यात साठवण्याचा केविलवाणा प्रयत्न. एकदम लक्षात आले आपण सोबत कॅमेरा आणलाच नाहीये.  धावतच परत मंदिरात गेलो, कॅमेरा घेतला तो पर्यंत पाऊस उघडल्यामुळे सगळीच गँग बाहेर धुडगुस घालायला निघाली होती. तटबंदीवर पोहोचलो तो पर्यंत परत ढग दाटले इतके की बुरुजावर थांबलेल्या लोकांचे फक्त आकार समजतील. मग त्यांचे काही फोटो घेतले. 























गडाच्या तटावर जावून ढग निघुन जाण्याची वाट पहात थांंबलो, काही वेळातच ढगांचा पडदा परत बाजूला झाला. द-या खो-यातून नागमोडी वळणे घेत जाणारी जगबुडी नदी, सभोवतालच्या डोंगरांवरून कोसळणारे धबधबे, दुर परंत पसरलेल्या डोंगररांगा आणि त्याच्या माथ्यावर रेंगाळणारे ढग. अतिशय विहंगम दृश्य काहिंनी नजरेने पिले तर काहिंनी कॅमे-यात बंदिस्त केले. मुलांनी इतका धुडगुस घातला की ज्यु. मल्लिनाथ आणि ज्यु. फडणविस यांना आपण दोघेच लहान आहोत का आपण आपल्या वर्गमित्रांबरोबर इथे आलो आहोत हा प्रश्ण नक्किच पडला असेल. बराच वेळ तिथे घालवल्यावर माघारी फिरलो वाटेत एका-दोन तोफा इतस्तत: पडलेल्या दिसल्या, गडावर एकूण १६ तोफा असल्याबद्दल कोणीतरी उल्लेख केला. गडाचे डागडुजीचे काम सुरू असल्याने त्याचेही सामान वाड्याच्या आत व अन्यत्र पडलेले होते.  पाउस पुन्हा सुरु झाल्याने मंदिरात परतलो. पुढचे चर्चा सत्र सुरु झाले त्यात गडावर ट्रेकिंग ला घेउन जाणा-या अन्य व्यवसायीक ग्रुप बद्दल चर्चा झाली. ते झाल्यावर जेवण केले. 

































तितक्यात आजुन एक ग्रुप गडावर आला आणि मंदिरात आश्रय / घुसखोरी करता येते का ते पाहु लागले. त्यांचे आखाड पार्टीचे नियोजन होते. ओंकार आणि आजुन कोणी त्यांना शिताफीने इथे जागा मिळणार नसल्याचे आणि देवळात हे असले आणाता येणार नसल्याबद्दल समजावून त्यांची रवानगी समोर असलेल्या कोठाराच्या (?) जागेत केली. आम्ही सुद्धा तातडीने पथा-या पसरल्या आणि चर्चा सुरु केली त्यात पुरातन घाटवाटा, त्यात त्याची सध्याची परिस्थिती याबद्दल माहिती सांगितली गेली. हे चालू असताना एक एक मेंबर झोपेच्या आधीन होऊ लागले, मला झोप कधी लागली ते समजलेच नाही.  सकाळी लवकर उठायचे होते पण जागच आली नाही उठलो तर काही जण चहाची तयारी करत होते, काही सकाळाचे कार्यक्रम करायला बाहेर पडले होते, मी ही आटोपुन घेतले. हेम ने सगळ्यांकडुन कवायतीचे काही प्रकार करून घेतले. कोणतेही मेहनतीचे कार्य करण्यापुर्वी झोपेमुळे ताठरलेल्या स्न्यायुंवर एकदम ताण पडु नये या साठी हे अत्यंत गरजेचे आहे. ते झाल्यावर मल्लीनाथ आणि केळकरांनी स्टोव्ह चा ताबा घेतला आणि काही वेळातच इतकी जबरदस्त मिसळ बनवली की बास, त्याला तोडच नाही. 































त्यानंतर आशिष ने त्याचा जम्मु ते पुणे सायकल फेरी चा प्रवास आमच्या समोर उभा केला. मुंबैकरांना लांबचा परतिचा प्रवास करावयाचा असल्याने आवरा आवरी सुरवात केली आणि गड उतरायला सुरवात केली. गाडीजवळ आल्यावर निरोपाच्या चारोळी सांगितल्या गेल्या. मेळाव्याची येथे सांगता झाल्याचे मांडण्यात आले. खालच्या गावात एस. टी बस ची सोय असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी मुंबैकर आमच्या गाडीत बसुन खाली आले तर आम्ही काही जण चालत खाली उतरलो तेवढेच ट्रेक ला आल्याचे पायांना समाधान. मुंबैकरांचा निरोप घेतला आणि आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत सावित्री नदीचे दुथडी भरुन वहाणारे पात्र दिसले. ओंकार आजुबाजुला दिसणा-या गडांची नावे सांगत होता. महत्वाचे म्हणजे बरोबर आलेल्या दोन्ही लहानग्यांनी ट्रेक मधे पुरेपुर मजा केली होती. वाटेत जेवणासाठी एका ढाब्यावर थांबलो तो पर्यंत पावसाची ये जा चालुच होती. ताम्हीणीच्या मार्गे लागल्यावर धुव्वाधार बरसात चालू झाली. ताम्हीणीच्या घाटात तर कोसळणा-या सर्वच धबधब्यांनी सर्वांना वेड लावले. मुळशी येथे वहातुकीच्या कोंडीत गाडी अडकली आगदी कासवाच्या गतीने बरेच अंतर गेल्यावरही तसा वेग मिळालाच नाही. तरीपण फारसा उशीर न होता घरी पोहोचलो होतो. 

रात्री झोप काही येईना व्हॅट्सप वर कोण कुठे पोहोचले सुखरुप पोहोचले का याची विचारणा सुरुच होती. सगळ्यात शेवटी म्हणजे सकाळी ५ ला नाशीककर पोहोचले होते. पण त्यांचा उत्साहाला मनापासुन सलाम. रात्री डोळा लागल्यावरही डोळ्यासमोर तिच चर्चा मेळावा, गड, किल्ले, असेच सारे डोळ्यासमोर दिसत होते. मेळावा ठरण्यापुर्वी झालेला चर्चेचा गदारोळ. अचानक काहिंनी पुढे होऊन केलेले मेळाव्याचे नियोजन मोठे कौतुकास्पद होते. विषेश करुन गडावर झालेली जेवणाची आणि रहाण्याची सोय. आणि जाणकारांनी त्यांचा आमच्या समोर ओतलेला माहितीचा खजिना. 


ह्या सह्यमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ३-४ वर्षाच्या काळाची निसर्गात/ सह्याद्रीत भटकण्याची भुक आज शमवली गेली. 



Other photos -