Wednesday, July 07, 2010

आभाळातून पडले मोती....

आभाळातून पडले मोती..

टपटप पानांवरती पडले
आभाळातूनी काचमणी
माळेमध्ये ओवीन म्हणते
काढून देता का कोणी?
-के अंजली-







Saturday, June 26, 2010

काळदुर्ग आणि ठाण्यातले काही भुईकोट किल्ले

उन्हाळा संपत आला होता आणि बरेच दिवस ट्रेक झालेला नव्हता. शनिवारी अचानक जीएस ने फोन करून सांगितले आज रात्री आपल्याला ट्रेक ला जायचे आहे ८ वाजता पुणे सोडायचे आहे. मी त्यावेळेस पुण्याबाहेर होतो माझी काहीच तयारी नव्हती, कॅमेराचे सेल सुद्धा पुर्ण चार्ज करायला वेळ मिळाला नाही. घरी ६ वाजता पोहोचलो मग थोडा उशीर होईल असे सांगुन मिळालेल्या वेळात टॉर्च आणि सेल चार्ज करून घेतले. जीएस, आरती, तात्या , सुभाष आणि मी असे पाच जण ठाण्याच्या दिशेने निघालो. ९ वाजत आले होते. वाटेत एक्स्प्रेस वे वर जेवण केले आणि पुढचा प्रवास सुरु केला.
काळदुर्ग चा किल्ला मनोर मार्गे पालघर ला जाण्यासाठी च्या रस्त्यावर आहे. रात्री वाघोबाच्या खिंडीत पोहोचलो तोवर १ वाजला होता. एकदम सामसूम होते, वाघोबाच्या मंदिरात पथा-या पसरण्याच्या तयारीत आम्ही होतो, पण तितक्यात दोन लोक दुचाकीवर तिथे पालघर च्या दिशेने आले त्यांनी आपापसात काहीतरी चर्चा केली आणि मग आमच्या कडे वळाले. त्यांनी सांगितले की ही जागा मुक्कामासाठी अतिशय अयोग्य आहे. लुटमारीचे प्रकार इथे होतात, तर तुम्ही पालघरात जाऊन कोणात्याही लॉज वर मुक्काम करावा. मग नाईलाजाने पालघर गाठले त्या लोकानी सांगितलेले काही लॉज शोधत असताना ते दुचाकीस्वार परत आमच्यापाशी आले आणि एक लॉज चा रस्ता सांगितला. जी ठिकाणे सांगितली होती तिथे खोल्याच उपलब्ध नव्हत्या आणि तोपर्यंत रात्रीचे ३ वाजले होते. पालघराकडे येताना घाट ओलांडल्यावर काही शेड तात्यांनी पाहिल्या होत्या. तिथे गेलो तर कोणत्यातरी हॉटेलची शेड होती ती, ओसरीतली लाईट चालू होती आणि रस्त्याच्या बाजूने भिंत आणि एक मोठा पार होता त्यामुळे चांगला अडोसा सुद्धा होता आणि प्रश्ण दोनच तासांचा होता त्यामुळे मग कसलाही विचार न करता तिथेच पसरलो. रात्री हवेत ब-यापैकी गारवा होता त्यामुळे छान विश्रांती झाली. सकाळी साडेपाच सहाला तात्यांनी नेहमीचे महत्वाचे काम केले आम्हाला झोपेतून उठवण्याचे. लगेचच तिथुन परत खिंडीत पोहोचलो. सकाळची कामे उरकून घेतली.

वाघोबाचे मंदिर तसे ऎसपैस आहे, त्या मंदिराला लागुनच एक छोटेसे दुकानसुद्धा आहे तिथे ठंड सरबत, वेफर्स अश्या गोष्टी मिळतात. दुकान नुकतेच उघडले होते तिथल्या माणासाला गडावर जायचा रस्त्याची विचारपुस केली तेव्हा थोडे अंतर आमच्या पर्यंत येऊन रस्त्याबद्दल मार्गदर्शन केले. डोगराच्या ह्या भागात दाट झाडी आहे त्यामुळे त्यातून वाट काढताना चुकण्याची शक्यता आहे त्यात करवंदाच्या जाळीने काही ठिकाणी पायवाट झाकून टाकलेली आहे. त्यामुळे त्यातुन वाट काढताना करवंदाचे काटे त्यांचे काम करतात, जपुन जावे लागते. कोकणातली हवा आणि त्यात दाट झाडी त्यामुळे घामाच्या अक्षरश: धारा वहात होत्या. एका मोकळ्या कातळाचा सपाट भाग ओलांडुन आपण डोंगराच्या दुस-या रांगेवर म्हणजेच गडाच्या मागच्या बाजुला येऊन पोहोचतो. तेथुन गडाची योग्य पायवाट पकडावी लागते आम्हिही थोडे भरकटलोच पण वेळीच लक्षात आले. थोडा खडा चड चढुन गेल्यावर गडाच्या कातळकड्यापाशी येऊन पोहोचलो. इथे परत थोडी खडी चढण आहे आणि वाट सुद्धा घसा-याची आहे.
वर पोहोचल्यावर एक केवळ पाया शिल्लक असलेली दगडी भिंत दिसते. मग एक पाण्याची खोदीव टाकी, थोडे आजुन पुढे गेल्यावर ७-८ पाय-या चढल्या की गडाच्या माथ्यावर पोहोचतो. वरती आता पाण्याच्या खोदीव टाक्यांखेरीज काहीच नाही आणि टाक्यामधे पाणी नाही. गडाचा आकार पहाता मोक्याच्या जागेवर असलेली एक सुसज्ज चौकी एवढाच उपयोग केला जात असावा. कोकणातून देशावर येणा-यावाटेवर असल्यामुळे त्याला महत्व आहेच. तसेच ह्या किल्ल्याच्या सोबतीने असावा आणि तांदुळावाडी हे आजुन दोन किल्ले ह्या परिसरात आहेत. माथ्यावरून पालघर चा संपुर्ण परिसर नजरेत भरतो. हवा चांगली असेल तर समुद्रदर्शनही होऊ शकते.






बरोबर नेलेल्या भेळ चिवड्याची न्याहारी केली किती वाजले पाहिले तर आत्ताशी ९.३० च वाजले आहेत मग लगेच परतायचे छे. तिथे आजुन काहीवेळ थांबुन ११ पर्यंत खिंडीत पोहोचलो, घामाच्या धारांनी हैराण केले होते. मग मंदिराच्या प्रांगणातच पसरलो तर तिथे वर्दळ सुरू झालेली गावातून नवदांपत्यांची व-हाडी मंडळीची तिथे गर्दी वाढू लागली त्यामुळे तिथुन निघालो. थेट शिरगाव गाठले.

शिरगावचा किल्ला हा भुईकोट ह्या प्रकारात मोडणारा किल्ला आहे. तर किल्ल्यावरून समुद्र किनारा एकदम जवळ आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार प्रशस्त असुन भक्कम आणि २५-३० फुट उंचीची तटबंदी आणि बुरूज आहेत. आतली जागा सुद्धा बरीच मोठी आहे. आतमधे विशेष बांधकामे शिल्लक नाहीत. तटबंदीवर काही घुमट असुन तेथुन सभोवतालचा परिसराचे निरिक्षण करता येते. आम्ही गेलो तेव्हा आतमधे कोणत्यातरी भोजपुरी चित्रपटाचे शुटिंग चालू होते. त्यामुळे किल्ल्याचा एक भाग त्यांनी व्यापला होता आणि तिथे जाता येत नव्हते. भर गावात किल्ला असल्यामुळे किल्ल्याची निगा-दुरुस्ती केली जात असल्याचे दिसते.







आत्ताशी १२.३० च वाजले होते. भुकेची जाणिव झाली होती तरीपण एवड्या लांब आलोच आहोत तर मग तिथुन जवळ असलेला माहिमचा भुईकोट का सोडावा. माहिमचा किल्ला / गढी पाशी पोहोचलो. २०-२५ पुट उंचीची भक्कम तटबंदी. तटबंदिवर जाणारा जिना एवढेच तिथे शाबुत आहेत आत एक कोरडी विहिर दिसली. तटबंदीवरून लांबवर समुद्रकिनारा दिसतो. आता मात्र कडाक्याची भुक लागली होती मग चांगल्या हॉटेल चा शोध घेत केळव्याला पोहोचलो. इथे विसावा नावाचे एक चांगले हॉटेल आहे शाकाहारी-मांसाहारी दोन्हीप्रकारचे थाळी स्वरूपातले उत्कृष्ट आणि पोटभर जेवण मिळते. हॉटेलचा चालक तुम्हाला सांगतोच पोटभर जेवल्याशिवाय जायचे नाही म्हणुन. जेवण चांगले होते.






केळव्याला दोन कोट आहेत एक किना-यावर तर दुसरा थोडा समुद्रात. आम्ही पोहोचलो तेव्हा नेमकी भरतीची वेळ सुरू झाली होती त्यामुळे समुद्रातील किल्ल्यावर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. दुसरा किल्ला जो किना-यावर आहे त्याला किल्ला किंवा गढी का म्हणावे असा प्रस्णच पडतो, इतका त्याचा आकार लहान आहे. आदमासे १००० चौ. पुट सुद्धा नसेल.








माहिम आणि केळवा हा किनारपट्टीचा भाग पौर्तुगीज अमलाखालील होता त्यामुळॆ त्यानी बांधकाम केलेले हे किल्ले तिथल्या बांधकामाचे स्वरूप हे त्यांच्या पद्धतीचे आहे.

आता गडाच्या इतिहासाबद्दल माहिती जमा करतो आहे. लवकरच ती इथे लिहिन.

Thursday, June 24, 2010

dhivar

आठवली आठवली
तळ्याकाठी गाती लाटा
लाटांमधे उभे झाड
झाडावर धीवराची
हाले चोच लाल जाड
शुभ्र छाती पिंगे पोट
जसा चाफा यावा फुली
पंख जणु थंडीमध्ये
बंडी घाले आमसुली
जांभळाचे तुझे डोळे
तुझी बोटे जास्वंदीची
आणि छोटी अखेरची पिसे जवस फुलांची
गड्या पाखरा तु असा
सारा देखणा रे कसा
पाण्यावर उडताना नको मारु मात्र मासा

Tuesday, May 25, 2010

राजगड...

राजगड-

पुण्यापासून केवळ ६०-६५ किमी अंतरावर असलेला राजगड म्हणजे, एका दिवसात जाऊन गडमाथा गाठता येतो आणि तितक्याच गतीने परतता येते असे ठिकाण, बरेच लोक असेच सांगतात. पण संपुर्ण गड एका दिवसात व्यवस्थीत पहाणे केवळ अशक्यच, आणि राजगडाच्या तिनही माच्या आणि पहायचा तर कमीतकमी २ दिवसांचा मुक्काम करायला पाहीजे. पण, सध्या मोकळ्या वेळेचे गणित जुळवणे फारच अवघड झाले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात पहिल्यांदा राजगड ला गेलो होतो, तेव्हा गडाचा आकार, रचना पाहुन मनाशी ठरवले की राजगड चा कानाकोपरा टप्प्या टप्प्याने का होईना पण पहायचाच आणि तेव्हा पासून ही माझी राजगडाची पाचवी भेट.

१६४६-४७ मधे तोरणा घेतल्या नंतर शिवाजी राजांनी राजगडही जिंकुन घेतला. त्याकाळी राजगडाचे स्वरूप केवळ एक टेहाळणीची चौकी म्हणुन होते, तर मुरंबदेवाचा डोंगर या नावाने ओळखला जात होता. डोंगराचा आकार त्रिकोणी असुन भौगोलीक दृष्ट्या अतिशय दुर्गम ठिकाणी आहे. महाराजंनी गड घेतल्या नंतर तोरण्यावर मिळालेल्या धनाच्या सहाय्यने गडाचे बांधकाम सुरू केले. गडाच्या पुर्वेला पद्मावती, दक्षिणेला सुवेळा आणि पश्चिमेला संजीवनी अश्या तिन माच्या आणि पद्मावती उत्तुंग अभेद्या असा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यावर अनेक गरजेच्या इमारतीची बांधकामे केली. राजधानीचा गड असल्यामूळे गडावरील प्रत्तेक बांधकाम अतिशय सुबकतेने विचारपुर्वक करण्यात आलेले आहे. एका दिवसात हे इतके सर्व पाहुन होणे केवळ अशक्यच.

गडावर जाण्यासाठी १) पाली दरवाजा मार्गे २) गुंजवणे-चोर दरवाजा ३) अळु दरवाजा ४) गुंजवणे दरवाजा आणि आजुन एक वाट गुंजवणे गावतून सुवेळा माचीवरील मधल्या भागातून वर घेऊन येते. ह्यापैकी गुंजवणे-चोर दरवाजा आणि पाली दरवाजा हे दोन मार्ग जास्त प्रचलीत आहेत. आळु दरवाजाची वाट राजगड-तोरणा ह्यांना जोडणारी वाट आहे.

पाली दरवाजा मार्गे गडावर जायचे असेल तर पुण्याहून नसरपूर - मार्गसनी - वाजेघर मार्गे भोसलेवाडी येथे यावे. पाली दरवाज्याची वाट पाय-यांनी बांधलेली आहे आणि इतर रस्त्यांपेक्षा इथे थोडे अधिक वरपर्यंत कच्च्या रस्त्याने गाडीने वरपर्यंत जाता येते. पुढे काही अंतर कारवीच्या दाट रानातून आंगावर येणारा चढ आणि मग ३००-३५० पाय-या चढून गेल्यावर पाली दरवाजा क्र. १ च्या प्रचंड मोठ्या बुरुजापाशी येऊन पोहोचतो. दरवाज्यातून प्रवेश करण्यासाठी मात्र थोडे वळसा घेऊन जावे लागते. त्याकाळी उपलब्ध असणा-या शस्त्र-अस्त्रांपासुन दरवाज्याचे रक्षण करता येईल अशी योजना केली आहे. पहिल्या दरवाज्याने आत शिरल्यावर दोन्ही बाजूंनी तटबंदी असलेल्या मार्गने आजुन काही पाय-या चढुन गेल्यावर दोन बुरजांच्या संरक्षण लाभलेला दुसरा दरवाजा दिसतो. १५-२० फूट उंची असलेल्या दरवाज्याचे आणि बुरूजाचे बांधकाम पहाण्यासारखे आहे. दुस-या दरवाज्याने आत प्रवेश केल्यावर दरवाज्याच्या दोन्ही बाजुना सैनिकाना बसण्यासाठी ओसरी सारखी जागा आहे तिला अलंगा असे म्हटले जाते. त्यावाटेने तसेच पुढे चालत गेल्यावर एका बांधीव तळ्याजवळून पुढे जात आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो.

दुसरा आणि जास्त प्रचलीत असलेला मार्ग म्हणजे गुंजवणे-चोर दरवाजा मार्गे जाणारी बाट. तिथे जाण्यासाठी नसरापूर - मार्गसनी - गुंजवणॆ मार्गे यावे लागते. पाली दरवाज्यापेक्षा ही वाट जास्त लांबीची आहे पण तिथल्यासारखा एकदम आंगावर येणारा चढ नाही. आणि ब-याच अंतरापर्यंत झाडांच्या सावलीचा आधार मिळातो त्यामुळे चालताना जास्त दमछाक होत नाही. बराच वेळ चालल्यावर चोर दरवाज्याच्या कातळकड्यापाशी येउन पोहोचतो. इथे थोडी खडी चढण आहे पण रेलीग लावल्यामुळे सुरक्षीतपणे आपण पद्मावतीमाची वर पोहोचतो. समोर पद्मावती तळे अनेक बांधकामे आणि त्यामागे असलेला बालेकिल्ल्याचा उत्तरबुरुज नजरेत भरतो.

पद्मावती माची ही इतर दोन माच्यांपेक्षा लांबीने कमी पण रुंदीने पुष्कळ मोठी आहे. गडाच्या महत्वाच्या इमारती ह्याच माचीवर दिसतात. बारा महिने पाणि पुरेल इतका मुबलक पाणिसाठा असलेला पद्मावती तलाव. तलावाचे निट निरिक्षण केल्यास तळ्याच्या सभोवती सर्व बाजुने संरक्षक भित असली पाहिजे असे दिसून येते. तलावाच्या पुर्व आणि पश्चिम बाजुने असलेल्या दरवाज्याने तळ्यात उतरण्यासाठी असलेली वाट दिसते. तलावाच्या डाव्या बाजुला एकारांगेत अनेक खोल्या असलेले बांधकाम दिसते, गडावरील शिबंदींचे रहाण्याचे ठिकाण असावे. पुढे उजवीकडे अलिकडील काळात बांधलेले (??) यात्रीनिवास लागते, त्यानंतर एक समाधिचे बांधकाम दिसते ती म्हणजे राणी सईबाई ह्यांची समाधी होय. समोरच पद्मावती देवीचे प्रशस्त मंदिर आहे. २५-३० लोकांची मुक्कमाची सोय इथे होऊ शकते. मंदिराच्या भोवताली पाण्याची काही टाकी खोदलेली आहेत. काही टाक्यातलेच पाणी पिण्यायोग्य आहे. देवळाच्या मागील बाजुस सध्याची वापरात असलेली सरकारी कचेरी आहे. पद्मावती मंदिरासमोर रामेश्वराचे छोटे मंदिर आहे. तेथुन ढालकाठीच्या दिशेने पुढे चालताना सदर, अंबरखाना, दारुखाना इत्यादी इमारतींचे अवशेष / जोती दिसतात. पाली दरवाजामार्गे येणारी वाट या ठिकाणी येऊन मिळते.

ढालकाठीची जागा म्हणजे ध्वजाचे ठिकाण. इथुन उजवीकडे जाणा-या वाटेने संजीवनी माचीवर जाता येते, सरळ गेल्यास बालेकिल्ल्यावर जाता येईल आणि डावीकडे गेल्यास गुंजवणे दरवाजा आणि सुवेळा माचीवर जाता येते. एका दिवसाच्या रपेटीमधे पद्मावती माची, बालेकिल्ला आणि सुवेळा किंवा संजिवनी माचीची धावती भेट किंवा बालेकिल्ल्याची पुर्ण टेहाळणी करता येऊ शकते.

डावीकडील वाटेने थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या कड्यापासुन ते खालच्या तटबंदीपर्यंत बांधून काढलेली एक भिंत लागते, ज्यामुळे पद्मावती माची बालेकिल्ल्यापासून वेगळी असल्याचे भासते. डावीकडे खालच्या बाजूला गुंजवणे दरवाज्याचा बुरुज दिसतो. इथुन खाली उतरणारी वाट अवघड आणि घसा-याची आहे. या वाटेने प्रयत्नकरून गडावर आल्यास वर येणास कमी वेळ लागतो असे त्या रस्त्याने आलेले ट्रेकर्स सांगतात, शिवाय तिथल्या झाडीमधे वाट चुकण्याचीही भिती आहेच.

सुवेळा माची - सुवेळा माचीचे बांधकामाचे तिन भाग दिसतात त्यातला एक टेकडीसारखा असलेल्या भागाला डुबा असे म्हणतात. त्याच्या अडोश्याने काही इमारतींचे बांधकाम दिसते ही कदाचित गडावरील प्रमुख सरदारांची निवासस्थाने असावीत. पुढे झुंजार बुरुजावर आपण येऊन पोहोचतो. बुरजाचे बांधकाम अतिशय सुबक आणि प्रशस्त आहे. बुरुजाच्या माथ्यावरुन पाहिल्यास सुवेळा माचीची पुढे धावत गेलेली तटबंदीची रांग दिसते. वुरजाच्या उजव्या बाजुस असलेल्या दरवाज्यातुन पुढे गेल्यावर एक भिंतीत असलेली श्रीगणेशाची सुंदर मुर्ती आपले लक्ष वेधुन घेते. सुवेळा माचीचे एक आकर्षण म्हणजे हात्तीनेढे. झुंजार बुरूजाखाली असलेल्या हात्तीच्या आकारासारख्या दिसणा-या प्रचंड खडकाला मधोमध पडलेले एक नैसर्गिक छिद्र. ह्या नेढ्यामधे १०-१२ माणसे एकावेळेस बसु शकतात इतके ते मोठे आहे. सुवेळा माचीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाताना वाटेत पाण्याची काही टाकी खोदलेली दिसतात. बालेकिल्ल्यापासुन सुवेळामाचीचे टोक सुमारे दिड कि.मी. वर आहे आणि संपुर्ण माचीभोवताली ५-८ फुट उची आणि ४-५ फुट जाडीची तटबंदी पहाण्यासारखी आहे. काही ठिकाणी तटबंदीचे दुहेरी पदर दिसतात, तर काही ठिकाणी ढासळलेली आहे.

बालेकिल्ला - सुवेळा माचीवरून परत येताना बालेकिल्ल्याच्या कड्याला भिडलेली एक पायवाट दिसते त्या वाटेने पुढे गेल्यावर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी डावीकडे काही पाय-या लागतात १०-१२ पाय-या चढून गेल्यावर खोबण्या कोरलेल्या कातळकड्यापाशी येऊन पोहोचतो. अतिशय उभी चढण आहे. खाचा-खोवण्या आणि लोखंडी रेलींग चा आधार घेत ५०-६० फुट चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक गुहा लागते. आणि आजून थोडे चढून गेल्यावर बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. महाद्वार प्रशस्त आणि १५-२० फुट उंचीचे असून दोन्ही बाजूला सुबक बांधकाम केलेले अष्ट्कोनी बुरुज आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर तिथल्या पाय-यांवर एक छोटी विश्रांती घ्यावीशी वाटते दरवाज्यातून सुवेळामाचीचे दिसणारे द्रुश्य आणि भन्नाट वारा काही क्षणात तुमचा थकवा दुर करतो. बालेकिल्ल्यातून आत प्रवेश केल्यावर समोर दिसते ते जननी मातेचे मंदिर. उजव्या हाताला गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी रस्ता आहे त्याने वर गेल्यावर अर्धगोलाकार असे चंद्रतळे दिसते. त्यापुढे गडाचे मुख्य दैवत म्हणजे मुरंबदेव म्हणजेच ब्रम्हऋशींचे छोटेसे मंदिर लागते. मंदिराच्या आजुबाजूला निट पाहीले तर असंख्य पाण्याच्या टाक्या खोदलेल्या दिसतील. तिथुन पुढे आपण उत्तर बुरूजावर येउन पोहोचतो. वरून संपुर्ण पद्मावती माची ते सिंहगडापर्यंतचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. उत्तर बुरुजातुन पद्मावतीमाचीवर उतरण्यासाठी एक गुप्तदरवाजाची वाट आहे. पण ती दगड टाकून बंद करण्यात आलेली आहे. उत्तर वुरूजावरून पश्चिम बुरुजावर तटबंदीच्या बाजुने जाणारी वाट आहे. त्यावरुन जाताना खाली दिसणारी पाली दरवाज्याची रचना लक्षात येते. पश्चिम बुरुजावरून डोकावले असता सुवेळा माचीप्रमाणेच लांबपर्यंत पसरलेली अतीशय रेखीव सुबक बांधकाम असलेली संजिवनी माची आणि त्यापुढे तोरण्यापर्यंतचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. पश्चिम बुरूजावरून दक्षिण बुरूजावर जाताना बालेकिल्ल्यावरील महत्वाच्या बांधकामांचे बहुदा महाराजंच्या निवासस्थान आणि कुटुंबातील अन्य लोकांच्या महालाचे अवशेष दिसतात काहींच्या संपुर्ण भंती आहेत तर काहींच्या अर्ध्या तर काहींची नुसतीच जोती शिल्लक आहेत तर काहीची अलिकडच्या काळात थोडी दुरुस्ती करण्यात आली आहे. राहीलेल्या अवशेषांवरून तेथे पुर्वी असलेल्या इमारतीच्या रचनेचा पुरेसा अंदाज लावता येईल. एका वाड्याच्या मागील बाजुस त्या काळी वापरात असलेले शौचकूप दिसतात. तिथेच एका बांधकामाला बाजारपेठ अशी अलिकडच्या काळात लावलेली पाटी दिसते. अनेक लोकांनी राजगडाच्या बालेकिल्ल्यावर बाजारपेठ असल्याचा उल्लेख करतात पण मनाला ते पटत नाही. असो. बालेकिल्ल्याचा परिसर तसा फारसा मोठा नाही १ ते २ तासामधे बराचसा भाग पाहुन होतो. दक्षिण बुरुजावरून पुढे चालत आपण परत महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. बालेकिल्ल्याची चढण चढताना जेवढी अवघड वाटते त्यापेक्षा ती उतरणे जास्त अवघड आहे.

बालेकिल्ल्याला खालील बाजुने प्रदक्षिणा घालता येत नाही. सुवेळा माची आणि संजिवनी माची या दोघांच्या मधे तिव्र उतार असलेली दरी आहे त्यामुळे संजिवनी माचीकडे जाण्यासाठी परत ढालकाठीच्या जागेकडे यावे लागते. एवढे फिरून होईपर्यंत सुर्य पश्चिमेकडे कललेला असतो. मग तोरण्याच्या मागे मावळणा-या सुर्याचे दर्शन घेतल्या नंतर त्यादिवसाची भटकंती तिथेच थांबवावी लागते. रात्रीचा मुक्काम हा पर्यटकनिवासात किंवा पद्मावतीदेवी मंदिरात किवा सरकारी कचेरीमधे तिथल्या सेवकाच्या परवानगीने करता येतो. गडावर काही ठराविक ठिकाणी तसेच गुंजवणे-चोर दरवाजा मार्गावर आणि पाली दरवाजा मार्गावर पायथ्यापासुन वरपर्यंत लांब-लांब अंतरावर सौर दिवे बसवलेले आहेत. रात्रीचे ट्रेकीग करताना त्याचा मार्गदर्शकाप्रमाणे उपयोग होतो.

पहाटेच्या गारव्याने सुर्योदयापुर्वीच जाग येते. लक्षात येते की सुर्योदय होण्यास आजुन बराच अवधी आहे, तोपर्यंत सकाळचे कार्यक्रम उरकून घेता येतात. पद्मावतीमाचीवरून अप्रतिम सुर्योदय पहायला मिळतो. संजिवनी माचीवर जाण्याची वाट बालेकिल्ल्याच्या उजव्याबाजुने गेलेली आहे. उजव्या बाजुला पाली दरवाजा मागे टाकून त्या रस्त्याने पुढे जाताना काही मधमाशांची पोळी दिसतात. आजून पुढे गेल्यास वरच्या बाजुला कड्यच्या भिंतीपासुन थोडा बाहेर निघालेला एक सुळका आपले ध्यान वेधुन घेतो. लवकरच आपण संजिवनी माचीच्या पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचतो. संजिवनी माचीचे तिन वेगळे भाग असल्याचे आपल्याला लक्षात येते. पहिला भाग हा थोडा जास्त रुंदीचा असून तेथे काही बांधकामचे अवशेष दिसतात. दुस-या टप्प्यावर माचीची तटबंदी ने केलेली संरक्षण रचना लक्षात येते. ह्या टप्प्यावर पाण्याच्या काही खोदीव टाक्या आहेत, काही टाक्यांमधे उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी टिकून असते पण वापरा अभावी ते पाणी पिण्यायोग्य नाही. तिसरा टप्पा पहिल्या दोन्हीपेक्षा रुंदीने कमी असला तरी दोन्हीपेक्षा दुप्पट लांब आहे. या टप्प्यावर उतरता क्षणी चिलखती तटबंदी ची वैसिष्टपुर्ण रचना नजरेस पडते. सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्यावर या पद्धतीचे थोडे बांधकाम आहे पण त्याचे वैसिष्ट तिथे लक्षात येत नाही. माचीच्या दोन्ही अंगाला तटबंदिचे दोन पदर असून दोन भिंतीच्या मधे साधारण्पणॆ दिड फुट अंतर आहे उंची ६ फुटा पासुन काही ठिकाणी १२ ते १५ फूट इतकी आहे. ह्या फटीतून एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत बिनदिक्कत पणे जाता येते फक्त आत कोणता प्राणी नाही ह्याची खात्री करून घ्यावी. ह्यातुन तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस उतरण्यासाठी केलेला दरवाजा दिसतो. माचीच्या शेवटच्या टोकाकडे जाऊन मागे वळुन पाहील्यावर गडाच्या उत्कृष्ट , भव्या, आणि सुबक बांधकामाची कल्पना येते. यासारखे शिवकालीन बांधकाम अन्यत्र पहावयास मिळणार नाही. वरून खाली पाहीले असता दुरदूरवर पसरलेल्या संह्याद्रीच्या रांगा, नद्या निरेचा जलाशय आणि अभेद्य तोरणा आपल्याला खुणावत असतो. गडाच्या घे-याचे निट निरिक्षण केल्यास मधेच काही उंचीवर ८-१० घरांची वस्ती दिसते, त्याचे अस्तित्व शिवपुर्वकालापासुनचे आहे. गडाच्या संरक्षणाची एक योजनाच आहे ती, गडाच्या गस्तीची जबाबदारी ह्या घेरेक-यांची. शत्रूचा हल्ला झालाच तरी त्याला तात्पुरते थोपोवणे आणि हल्ल्याची सुचना गडाला देण्याचे काम ह्या लोकांवर सोपवलेले आहे. इथे पोहोचेपर्यंत २-३ तास निघुन गेलेले असतात. मग पद्मावतीमाचीवर पोहोचल्यावर जेवणाची सोय करायची आणि पद्मावती तलावाच्या पाण्याने थोडे ताजेतवाने होऊन गड उतरण्यास सुरवात केल्यास दुपारी ३ पर्यंत गुंजवणॆ गावात पोहोचता येईल. मग लगेच ४ च्या एस. टी. ने पुणे गाठता येऊ शकते.

राजगडाचा प्रत्तेक ट्रेक हा पुर्विपेक्षा वेगळा अनुभव देणारा असतो. प्रत्तेक ऋतू मधे त्याचे वेगळेपण दिसते. उन्हाळ्यात गेलात तर गडाच्या कानाकोप-यात घुसता येते. रात्रीचा मुक्काम किंवा रात्रीचा ट्रेक हे ऊन्हाळ्यात करण्यात वेगळीच मजा आहे जे इथल्या धुव्वाधार पावसात किंवा कडाक्याच्या थंडीत शक्य होत नाही. पावसाळ्यात केवळ अपेक्षा धुव्वाधार पावसाचीच, डॊंगर उतारावरून फेसाळत उतरणारे झरे आणि ढगांनी भरून गेलेला आसमंत. काहीवेळा अचानक ढग बाजूला सरकून त्या झरोक्यातून दिसणारे दृश्या अप्रतीम. पावसाळ्यात इथे यावे ते केवळ ह्यासाठीच. हिवाळ्याचा सुरवातीचा काळात राजगड म्हणजे अगणित रानफुलांनी नटालेला स्वर्गच. हिवाळ्यात शेकोटी वगैरे करून एखाद दिवस थंडीने कुडकूडत मुक्काम करता येऊ शकतो, मात्र दिवसा उशीरापर्यंत दाटून राहिलेले धुके आणि लवकर पडणारा आंधार आणि गोठवणारी थंडी ह्यामुळे हिवाळ्यातला मुक्काम सुखावह होत नाही. सध्या सुट्टीच्या दिवशी गेलात तर जेवणाची सोय होऊ शकते, तसेच ताक आणि लिंबुसरबत विकणारी गावातली पोर सुद्धा गडावर असतात.

आता परत राजगडावर जायचे आहे, पावसाळ्यात. वर्षाविहाराला.

Saturday, May 08, 2010

Saturday, March 13, 2010

रायगड..

शनिवारी-रविवारी भारत इतिहास संशोधक मंडळाने रायगड च्या अभ्यास ट्रेक ची आखणी
केली होती, तर गिरीदर्शन क्लब कडे ट्रेक च्या व्यवस्थापनाचे काम दिले होते. पुण्यातून
निघताना १२.३० वाजता जायचे ठरले. १२.३० ची वेळ ठरवल्यामूळे शनिवारी ऑफिस सुटल्यावर
घरी येउन बॅग आणि ट्रेक ची पुर्व तयारी करायला वेळ मिळणार होताच. शनिवारी दुपारी १२
वाजता सतिश मराठे (गिरीदर्शन चे संचालक) यांनी फोन करुन विचारले. "तुम्ही आज ट्रेक ला
येणार आहात ना ??" मी हो म्हटले,"किती वाजेपर्यंत पोहोचणार आहात ? मी तुमची वाट
पहात आहे. बाकी सगळे लोक जमले आहेत." मला एकदम काही कळलेच नाही. त्याना परत
विचारले आपण आज रात्री जाणार आहोत ना ??, त्यावर मराठे म्हणाले, " आपल्याला रात्री
नाही तर आत्ता दुपारी १२.३० वाजता निघायचे आहे, तर तुम्ही किती वाजे पर्यंत येथे
पोहोचणार आहात". मग नाईलाजाने मी येत नाही असे कळवले. थोडा शांतपणे विचार केला,
रायगडला तर जायचेच होते. मग बाईक वर जाण्याचे ठरवले. सोबत माझा मावसभाऊ सुशांत ला
नेण्याचे ठरवले. ऑफिस मधुन लगेच परवानगी घेऊन घरी गेलो, जमेल तशी बॅग भरली आणि २.३०
वाजता सुशांतच्या घरी पोहोचलो. बाहेर भयंकर उन होते त्यामुळे थोडे उशीरा निघण्याचे ठरवले.

सायंकाळी ५.३० ला घर सोडले. आता रात्री पोहोचायला उशीर होणार होता, बरोबर चटणी
पोळी घेतली होती पण तेवढे पुरेल असे वाटले नाही म्हणुन पौड जवळ काही खाद्य सामग्री
खरेदी केली. मराठे यांना फोन करून आम्ही येत असल्याची कल्पना दिली. मुळशी - डोंगरवाडी
- ताम्हीणी - विळे - कोलाड मार्गे १०.३० पर्यंत माणगाव येथे पोहोचलो. माणगावच्या पुढे
एका रायगड दर्शन नावच्या ढाब्यावर थांबलो बरोबर नेलेली पोळ्या, दही, बुंदी आणि
ढाब्यावरील शेवभाजी आणि वाफाळलेल भात असा झकास बेत जमला. जेवण झाल्यावर हॉटेल
मालकाबरोबर बराच वेळ महागाई, राजकारण, मराठी माणुस पासुन रायगड अश्या अनेक
विषयांवर गप्पा मारल्या, त्यांनी सांगितले की जगदीश्वराच्या पुजेसाठी दर रविवारी काही
लोक नियमीतपणे सांगलीहुन पुजेसाठी येत असतात. आजुन पुढचा बराच प्रवास बाकी होता, मग
त्यांच्या निरोप घेतला. पुढे महाड ला पोहोचलो तेथुन रायगड २४ किमी वर आहे. हमरस्ता
सोडला तसे रहदारी पुर्ण संपली. तिन चार किमी नंतर एखादे वहान दिसत होते. लग्नसराईचे
दिवस होते त्यामुळे एका वस्तीमधे मध्यरात्री लग्नाची वरात चालु होती. १२.३० पर्यंत
रायगड चित दरवाजा जवळ पोहोचलो. काही दुचाकी तिथे उभ्या होत्या त्यात आमचीसुद्दा
गाडी लावून टाकली. बॅगा भरताना टॉर्च घ्यायची विसरलो होतो आणि अष्टमीचा चंद्र काही
उगवला नव्हता. गडाच्या रस्त्याची थोडीपार कल्पना होती त्यामुळे १०-१५ मिनीटे विश्रांती
घेउन गड चढायला सुरवात केली. खुबलढा कोटगुल्माच्या बाजूने पाय-यांच्या वाटेने जाताना
फारसा त्रास होत नव्हता, पण वारा लागतच नव्हता त्यामुळे घामाच्या धारा वाहु लागल्या
होते. मग थोडे पुढे उंचीवर डोंगराचा आडसर नव्हता अश्या ठिकाणी वा-याची झूळूक मिळायची.
विजेरी नव्हती म्हणून फारशी अडचण वाटत नव्हती. गरज वाटल्यास ते काम मोबाईल च्या
लाईटच्या सहाय्याने भागवले. गडाच्या कातळ भिंतीच्या जवळ पोहोचलो. जरा सपाटीची
कॉक्रिट टाकुन तयार केलेली वाट लागली तिथेच अर्धातास झोप काढली मग बरे वाटले. पावणे
दोन वाजता परत चालायला सुरवात केली. पावणेतिन च्या सुमारास भव्य अश्या कोटगुल्मांचे
संरक्षण असलेला महादरवाजापाशी येऊन पोहोचलो. महादरवाज्याची रचना पहाण्यासारखी आहे.
दरवाज्यातुन आत वळुन परत पाय-यांची चढण लागते. ती पार केल्यावर आपण हात्ती तलावाच्या
समोर येऊन पोहोचतो. गडावर जिल्हापरिषदेने बांधलेले विश्रामगुह आहे. त्याचा लाईट चालू
होता त्यामुळे त्या दिशेने गेलो. तिथे नव्याने काही खोल्या बांधुन काढल्या आहेत तर काही
लोखंडी शेड बांधल्या आहेत. पत्र्याच्या बंदिस्त जागेत काही मंडळी गाढझोपेत होती. त्याना
त्रास न देता बाहेरच्या जागेत आम्ही झोपलो. सकाळी थंडी भयंकर थडी वाजु लागली त्यामुळे
दोघांचीही झोपमोड झाली, सकाळाचे ५ वाजले होते. मग परत झोपायचा प्रयत्न केला पण
गारव्यामुळे झोप काही लागली नाही. ५.४५ ला उठलो. काही मंडळी आजुनही झोपलेली होती.
आम्ही आवरून सूर्योद्‍य पहाण्याच्या उद्देशाने गडावरील नगारखान्याच्या बाजुला असलेल्या उंच
टेकाडावर जाऊन बसलो. वातावरण ढगाळले होते, पण नेमक सूर्योद्‍य होण्यापुर्वी सगळे ढग
बाजूला झाले, आणि त्यातच जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजुने उगवत्या सूर्याचे दर्शन झाले.
काही वेळ तिथूनच गड न्याहाळत बसलो आणि विश्रामगृहाकडे गेलो, तो पर्यंत बाकीची मंडळी
आवरून तयार झालीच होती. चांदोरकर काका जगदीश्वराच्या मंदिरामागे असलेल्या
शिवस्मारकापाशी जाऊन पोहोचले होते. सगळे जमल्यावर त्यानी गडाची माहिती देण्यास
सुरुवात केली.

गोपाळ चांदोरकर हे आर्किटेक्ट असून त्यांनी गडावरील प्रत्तेक इमारतींचा स्थापत्यशास्त्रचा
आधार घेऊन अभ्यास केला होता. अनेक इमारतींचे त्याच्या शिल्लक राहिलेल्या बांधकामाची
मोजमापे घेऊन त्याचे नकाशे त्यांनी बनवले आहेत. त्या नुसार ती इमारत काय असावी ह्याचा
बरोबर अंदाज लावता येऊ शकतो. जगदीश्वर मंदिरापासून पुढे असलेल्या गडाच्या पुर्व भागात
गडावरची मुख्य सैन्य छावणी होती. तर दोन दारूगोळा कोठारे ह्याच भागात दिसतात. हा
किल्ला फार प्राचिन असून तो सातवहान काळापेक्षाही जुना असल्याच्या खुणा इथल्या प्रत्तेक
तळ्यात सापडतात. यादव राजवटीच्या समाप्ती नंतर येथे बहामनी मुस्लिम राजवटीची सत्ता
सुरु झाली तेव्हा त्या काळात त्यांनी गडावरील सर्व मंदिरे फोडली आणि त्या जागी दर्गा -
मशीदी बांधल्या. शिवाजीराजांनी हा गड घेतल्यावर पुन्हा त्या ठिकाणी मंदिर अधवा इतर
बांधकामे केली, त्यातलेच एक बांधकाम म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मग चांदोरकर आम्हाला कोळेम
तलावाकडे घेवून गेले. तळ्याचे निट निरीक्षण केले असता पुर्वी तिथे असलेल्या लेण्यांचे अवशेष
दिसतात. तलावातले पाणी बरेच कमी असले तरी पिण्यासाठी मुख्यत्वे याच पाण्याचा वापर
केला जातो. ह्या किल्ल्यावर नैसर्गीक पाण्याचा स्त्रोत नाही त्यामुळे गडावर ह्या प्रकारे
तळी बांधून काढली आहेत. गडावर तळे असण्याचे आणखी एक कारण म्हणजे गडावरील
बांधकामासाठी लागणारा दगड खोडुन काढल्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साठवता येईल
अशी व्यवस्था केली जाते. मग सध्या जी बाजारपेठ म्हणुन ओळखली जाते त्या इमारतींपाशी
पोहोचलो. ही बाजारपेठ नसून स्वराज्य कारभारातील वेगवेगळ्या विभागांच्या असलेल्या कचे-या
आहेत. बाजारपेठ ही गडाच्या इतक्या उंचीवर असण्याचे कारणच नव्हते, कारण गडावर रहाणारे
लोक हे मुख्यत्वे करून सैन्यातील काम करणारे मुख्य अधिकारी आणि गडाचे संरक्षणासाठी लागणारे
निवडक सैन्य आणि त्याच्या सुविधा पुरवणारे बलुतेदार यांचाच वावर असे. सामान्य नागरीक हे
गडाखाली असणा-या गावात रहात असत. सामान्य नागरीक जर गडाखाली रहात असेल तर
इतक्या वर केवळ बाजारहाटासाठी तो येणे शक्य नाही. बाजार पेठेत एकुण २२+२२ अशी ४४
दालने असल्याचे सांगितले जाते पण प्रत्यक्षात ती २२+२१ अशी ४३ दालने आहेत. तिथुन पुढे
होळीचा माळ हा ठिकाणी गेलो, तिथे शिवाजीमहाराजांचा सिंहासनारूढ पुतळा स्थापन केला
आहे. मग सकाळची न्याहारी करून हात्तीखाना म्हणुन सांगितली जाते त्या इमारतीकडे गेलो पण
त्याला कुलूप लावले होते. त्याचा दरवाजा एवढा लहान होता की हात्ती आत जाणे शक्य
नाही. चांदोरकर त्या इमारतीला नाट्यशाळेची इमारत असे म्हणतात, नाट्यशाळे प्रमाणेच
आतली रचना आहे. हात्ती हा प्रकार महाराजांच्या सैन्यात नव्हता. नाट्यशाळेच्या जवळच
शिर्काई देवीचे मंदिर दिसते. तिथुन पुढे कुशावर्त तळ्याच्या बाजुला गेलो तिथे एक दगडी
बांधकाम दाखवले, सध्या त्याला तुपाचे टाके म्हणुन सांगितले जाते. पण चांदोरकर म्हणतात की
तुपाची साठवण हवा लागणार नाही अश्या जागी केलेली असते, त्या खोलीत तळ दगडी टाक्या
प्रमाणे असून छताला झरोके आहेत, कौटील्या अर्थशास्त्राच्या आधारे त्यांनी ते टाके असलेली
खोली म्हणजे इसवीसन पुर्व काळातले पर्जन्यमापनाचे यंत्र असावे. कुशावर्त टाक्यात असलेल्या
लेण्या पाहिल्या तसेच पाण्याला बांध म्हणुन घातलेली भिंतीच्या मागील बाजूस उतरून तिथे
असलेले गोमुख त्यांनी दाखवले. त्याचा उपयोग तलावात आलेला गाळ वाहून जावा अशी त्याची
रचना केली आहे. कुशावर्त तळ्याच्या बाजूला एका मोठ्या वाड्याचे अवशेष दिसतात. जोत्यावर
मुख्य इमारत असून दोन खोल्या असलेले घर तिथे आहे. भोवताली मोकळी जागा असून काही अंतर
सोडून त्या घराला दगडी-विटांचे कुंपण घातले आहे. अश्या प्रकारची रचना असलेली अनेक घरे
गडावर आढळतात. मग आम्ही गडावरची मुख्य इमारत म्हणजे राजवाड्याच्या नगारखान्यापाशी
पोहोचलो. नगारखान्याची इमारत पुर्णतः शाबुत आहे. दरवाज्याच्या वरच्या भागात दोन
शिल्पे कोरलेली आहेत, त्यात एका सिंहने आपल्या चारी पायाखाली एक एक हात्ती धरला आहे
आणि शेपटीने एका हात्तीला उचलले आहे. चांदोरकरांनी त्याचा अर्थ सांगीतला की " जो पाच
हात्तीना पराभुत करु शकतो, त्यांच्यावर जरब बसवू शकतो अशी त्या सिंहासारखी प्रबळ सत्ता
इथे नांदत आहे". नगारखान्यातून आपण राजवाड्यात प्रवेश करतो, डाव्या हाताला मधोमध एका
बांधकामाचे जोते दिसते, ती जागा म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ठिकाण होय,
त्यालाच दिवाण-ए-खास म्हणले जाते. ज्या ठिकाणी राजांना सप्तनद्यांचे स्नान घातले त्या
न्हाणिघराच्या खुणा तिथे दिसतात. आणि ज्या ठिकाणी सध्या आठ खांबी छत्र बसवले आहे ते
ठिकाण म्हणजे दिवाण-ए-आम. चांदोरकार काकांनी विचारले की ह्या जागेकडे बघुन इथे
शिवकालापुर्वी काय असावे ?. आम्ही निरुत्तरच होतो. पण त्यांनी सांगितलेले की हे ठिकाण
म्हणजे बहामनीकाळातली एक मशीद / दर्गा होती आणि ज्या जागी दिवाण-ए-आम मधे
महाराजांनी सिहासन ठेवले होते त्या खाली एक कबर आजुनही आहे. पण मशीदीच्या पुर्वी त्या
जागी वडेश्वराचे मंदिर होते जे बहामनी सुलतानंच्या काळात उद्वस्त करण्यात आले होते,
त्याचेही अवशेष चांदोरकरांनी दाखवले. इंग्रजांनी जेव्हा गडावर हल्ला केला तेव्हा त्यांनी
डागलेला एक तोफगोळा दिवाण-ए-आम च्या मागच्या भिंतीवर पडला पण तो फुटला नाही, तर
त्यातल्या पेटत्या दारूचा फवा-यामुळे तिथला एक दगड वितळला ते चांदोरकरांनी दाखवले.
दरबाराच्या मागच्या बाजूला राजांचा खाजगी महाल, राण्यांचा खाजगी महाल, राण्याचे
न्हाणिघर, स्वयंपाक घर, धान्य कोठार, ६ कचे-या (ज्याला तिथले गाईड राजांच्या सात
राण्यांचे सात महाल असे सांगतात.), एकदम आंधा-या जागी जमीनीखाली असलेली रत्नशाळा,
राजांची खासबाग ( राजवाड्यातील वाया जाणारे पाणी पाटबांधून ह्या खासबागेत आणुन
सोडल्याचे दिसते), पालखी दरवाजा, स्थंभ / मनोरे हे पुर्वी किती मजल्याचे होते हे सांगता
येणे अवघड आहे तरी ते तिनच मजली असावेत असे चांदोरकरंचे म्हणणे आहे. मनो-यामधे दुस-या
मजल्यावर आपण जाऊ शकतो. तिथे पुर्वी कारंजे असल्याच्या खुण दिसातात. मनो-याचे नक्षीदार
बांधकाम पहाण्यासारखेच आहे. पुढे गंगासागर तलावात उतरलो. तळाच्या दगडावर मोट्या खाचा
पाडल्याचे दिसले त्या म्हणजे बांधकामासाठी पुर्वी कश्या प्रकारे दगड मिळवला जात असे हे
आपल्याला समजते. मग महादरवाज्याचे वरूनच निरीक्षण केले. हात्ती तलावाच्या वरच्या बाजूला
एक लोखंडी खांब उभा दिसतो तो खांब म्हणजे सातवहान कालीन वेळ मोजण्याचे यंत्र असल्याचे
चांदोरकरांनी सांगितले. दुपारचा एक वाजत आला होता. मग देशमुख खानावळीत जाऊन जेवण
केले. २ वाजता परतीच्या प्रवासाला निघण्याची वेळ मराठेंनी ठरवली होती. मी आणि सुशांतने
रोप-वे ने खाली उतरण्याचा अनुभव घेण्याचे ठरवले. खाली उतरण्यासाठी ७५/- रूपये इतके
तिकीट असुन जाण्या येण्याचे तिकीट १५०/- ला तर केवळ वरती येण्यासाठी १००/- तिकीट
आकारले जाते.
लहान मोठी अनेक चाके तिथे दोरीला आधार देत फिरत असतात. दोरीला खाली जाणा-या
एकामागोमाग एक अश्या दोन खाली जाणा-या व त्याच वेळेस खालून वर येणा-या दोन ट्रॉलिज
जोडलेल्या आहेत. एका ट्रॉलीमध्ये ५-६ लोक बसू शकतात. आमचा नंबर आल्यावर आम्ही सुद्धा
बसलो. जसे त्या ट्रॉली ने खाली उतरायला सुरूवात केली तसे काही क्षण एकदम पोटात गोळा
आला. पण आप्ण सुरक्षीत असल्याची खात्री झाल्यावर तिथून दिसणारे दृश्य कॅमेरात टिपले. केवळ
५ मिनीटात आपण खालई येऊन पोहोचतो. पण आम्ही आमच्या गाड्या वरच्या बाजूला लावल्या
असल्यामुळे १.५ किमी चालत चित्त दरवाजा गाठला. उन्हात तापलेली गाडी सावलीत लावून
तिथल्या दुकानदाराकडे तिथुन थेट निजामपुर / माणगाव कडे जाणा-या रस्त्यांची चौकशी केली.
पाचाड मार्गे एक रस्ता तुम्हाला थेट माणगावला अथवा निजामपुरला जाता येते. पण रस्त्याचे
काम चालू असल्याकारणामुळे ५-६ किमी चा रस्ता खराब आहे. ह्या रस्त्याने गेलो तर १५-२०
किमी चे अंतर वाचणार होते. तसेच कोलाड ऐवजी निजामपूर मार्गे गेल्यावर आजून १५ किमी
अंतर वाचणार होते म्हणुन त्याप्रमाणे पाचाडमार्गे या रस्त्याने प्रवास केला. काही अंतर पार
केल्यावर लगेचच तो रस्ता किती खराब आहे ह्याचा प्रत्यय आला. कच्च्या मातीचा तिव्र
उताराचा रस्ता तर त्यापुढे तितकाच चढ आणि भाजून काढणारे ऊन. पुढे रस्त्यावर काही फाटे
आले पण दिशा विचारण्यासाठी कोणी माणुस तिथे नव्हता त्यामुळे निजामपुर चा फाटा हुकला
आणि आम्ही माणगाव ला पोहोचलो. मग पुढे निजामपुर मार्गे विळे येथे गेलो तिथे तासभर
विश्रांती घेऊन रात्री ९ वाजे पर्यंत घरी पोहोचलो.